राम गावडे : शिवसेनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्त
राजगुरूनगर – जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून नुकसानभरपाई म्हणून 25 हजार रुपये प्रति हेक्टरी तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत असल्याने हाताशी आलेली पिके पावसाच्या कचाट्यात सापडल्याने मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. याबाबत आता शिवसेना अग्रेसिव्ह झाली असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी केली आहे.
तसेच शिरूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विनाविलंब मदत दिली जावी, या मागणीचे निवेदन राम गावडे यांनी महसूल उपायुक्त प्रताप जारधव, पुणे विभाग, निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक ऍड. गणेश सांडभोर, हवेली तालुका संघटक स्वप्निल कुंजीर, प्रवीण कुंजीर, विनायक घेनंद यांच्यासह शेतकरी, शिवसैनिक उपस्थित होते.