संगमनेर – शिवसेनेचा मोर्चा म्हणजे नाटक आहे. ज्यांनी शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे वेळेत आणि योग्य भाव दिला पाहिजे, ते मोर्चा काढून जबाबदारी झटकत आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारने खासगी विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रडविले असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर केली आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने मुंबईतील बीकेसी परिसरात पीकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला होता. आ. थोरात पुढे म्हणाले, शिवसेना सध्या सत्तेत आहे. निर्णय घेणारे भाजप व शिवसेनाच आहे. मंत्रिमंडळात तातडीने बसून याबाबत निर्णय घ्यायला पाहिजे होता. मात्र तसे न करता शिवसेना मोर्चे काढून जबाबदारी झटकत आहे. यातून ते फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत.
सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना पेरणी सुरू करावयाची आहे. बॅंका पीककर्ज देत नाहीत. बियाणांसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही. यावर सरकारने मार्ग शोधला पाहिजे. यावर आम्ही विधानसभेतही आवाज उठवला होता. केंद्र व राज्य सरकारने या विम्याचा प्रीमियमसुद्धा भरला नाही. या सर्व दिरंगाईमुळे खासगी कंपन्यांना फायदा मिळत आहे. शेतकरी अडचणीत असताना मंत्री व सरकार काय काम करते, असा सवालही त्यांनी केला. टीका करायची आणि पुन्हा एकत्र बसायचे, हे शिवसेनेचे धोरण फक्त नाटकबाजी आहे. हे सर्व जनतेने ओळखले असून, राज्यातील शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य जनता आता भाजप-शिवसेनेच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष आ. थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.