हवेलीत तीन पक्षांमधील एकत्रीकरण : बेरजेचे राजकारण
वाघोली – राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ग्रामीण भागांमध्ये या तीन पक्षांच्या एकत्रीकरणाचा काय प्रभाव पडेल, अशी एकीकडे चर्चा होती. ती चर्चा आता तालुक्यातील तीन पक्षांतील नेत्यांनी राज्यात एकत्रीकरण ज्याप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील देखील आपली एकजूट वेगवेगळ्या माध्यमातून दाखवण्यास सुरुवात केली आहे. सध्या सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर तालुक्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांनी पेढे वाटून तसेच बॅनरबाजीतून मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याचे स्वागत केले, हे स्वागत करीत असताना पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो बॅनरबाजीमध्ये टाकून सर्वांचे एकत्रित अभिनंदन केले आहे.
आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये सकारात्मक परिणाम
शिरूर-हवेलीमधील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेतील अनेक दिग्गज मंडळींनी छुप्या पद्धतीने तसेच उघडपणे राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार यांना विजयश्री मिळवण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती. ही बाब एकीकडे तालुक्यात चर्चेत असतानाच राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस व मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे तालुक्यातील ज्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यांच्यादृष्टीने निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीन पक्षांतील नेत्यांकडून एकत्रित बॅनरबाजी
त्यामुळे फक्त भाजपच्या गोटामध्ये “कभी खुशी कभी गम’चा अनुभव आला आहे. तालुक्यातील शिवसेनेच्या ज्येष्ठ मंडळींनी पहिल्यांदा राज्य सरकारची आणि राज्य सरकारमध्ये समाविष्ट असणारे मित्र पक्षांचे आणि त्यांच्या उमेदवारांचे तसेच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी शपथ घेतली अशा सर्वांचे अभिनंदन करून एक नव्या राजकारणाला ग्रामीण भागातून चांगले वातावरण निर्माण करून दिले आहे, याची सर्वत्र चर्चा होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस व मित्र पक्षातील अनेक जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दलचा आदरभाव आणि एकमेकांच्या पक्षाबद्दलची निष्ठा जोपासून केलेल्या अभिनंदनामुळे सर्वत्र नवीन समीकरणाची नांदी आहे.