मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर झालेल्या सुनावणीमध्ये ५ सदस्यीय घटनापीठाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप न करण्याचा निर्णय जाहीर करत शिंदे गटाला मोठा दिलासा दिला. यानंतर शिवसेनेसह शिंदे गटातील बड्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावर काही भाष्य केले नव्हते. आज उद्धव ठाकरेंनी न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच शिवसैनिकांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आलेल्या पुणे यवतमाळमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि न्यायालयाच्या निर्णयासह निवडणूक आयोगाची कारवाई अशा विविध विषयांवर भाष्य केलं.उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेले शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्यावर देखील यावेळी हल्लाबोल केला. शिवसेनेतील काही माणसं ढळली, मात्र खरे अढळ आजही माझ्यासोबत आहेत. जिथे शिवनेरी आहे, तिथे गद्दार लोक आढळली नाही पाहिजेत, अशी टीका ठाकरे यांनी यावेळी आढळरावांचे नाव न घेता केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे नेमकं यावेळी
उद्धव ठाकरे म्हणाले,“गटप्रमुखांच्या मेळाव्यात मी बोलले होतो ते पुन्हा बोलेन. आपल्याला देवाने दिलेली ही एक संधी आहे. देशातील लोकशाही टिकवणं, खरं हिंदुत्व जोपासणं, वाढवणं ही संधी आपल्याकडे आहे. इतिहासात तोतयांचे बंड असं एक प्रकरण आहे, असे काही तोतये फिरत आहेत. पण नुसतं हातात भगवा असून फायदा नाही, तर ह्रदयात भगवा हवा,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच दसरा मेळाव्याला वाजत गाजत पण शिस्तीत येण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसैनिकांना केले.