मुंबई – मुख्यमंत्र्यांची एक तऱ्हा तर उपमुख्यमंत्र्यांची दुसरीच तऱ्हा असा एकंदरीत प्रकार राज्यात सुरू आहे. तरी सरकार कोठे आहे? मंत्रिमंडळ कोठे आहे? राज्यपाल महोदय समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत काय? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेसमोर आहेत. महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सगळा भार वाहत आहेत. एकंदरीत महाराष्ट्रात नवे सरकार आले की गेले तेच कळत नाही. सध्या प्रश्न इतकाच आहे की, राज्यात मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? मुळातच तो होणार की नाही? की विद्यमान सरकारचा ओंडका घटनेच्या पुरात वाहून जाणार आहे? असे सरकारच्या अस्तित्वाबाबतचे अनेक सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केले आहेत.
शिवसेनेतील फुटीर गटाबरोबर भाजपने पाट लावून दिल्लीच्या साक्षीने सात फेरे घेतले. पण वाजंत्री बहु गलबला होऊनही वऱ्हाडाच्या मुखी गोडधोडाचा घास काही जात नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, पण पंधरा दिवस उलटून गेले तरी मंत्रिमंडळाचा पत्ता नाही.अशा मार्मिक शब्दातून सामनातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आलाय.
काल शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केले महत्वाचे निर्णय
तत्पूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरकपातीसह अनेक महत्वाचे निर्णय काल जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत नव्या निर्णयांची घोषणा केली. ज्यामध्ये पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.