मुंबई – भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी देशातील विरोधी पक्षाबाबत एक वक्तव्य केलं होत विशेष म्हणजे यावेळी नड्डा यांनी थेट शिवसेनेचं नाव घेत जोरदार टीका केली होती. नड्डा यांनी केलेली टीका शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागलेली दिसते. “जी पी नड्डा ही व्यक्ती भाजपमधील इतरांपेक्षा जरी बारी आहे. असा एकंदरीत समज होता परंतु नड्डा देखील सब घोडे बारा टक्के या हिशोबाने चालू लागले आहेत” अशा शब्दात मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेने निशाणा साधला आहे.
“नड्डा यांचे विधान अहंकार व गर्वाने फुगलेले आहे. नड्डा यांनी शिवसेनेचा उल्लेख केला म्हणून सुरुवातीलाच सांगायला हवे. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. आज संबंधात दुरावा नक्कीच आहे, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात” अशा शब्दात सामनातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत.
अयोध्या आंदोलनाची करून दिली आठवण
७८ सालात काँग्रेसचा पराभव करून जनता पक्ष सत्तेवर आला. तेव्हाही ही घडी कायमची टिकेल असेच वातावरण होते. आज जनता पक्ष कोठे आहे? भाजपाही पाचोळ्यासारखा उडून गेलाच होता. अयोध्या आंदोलनाने व लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेने भाजपाला तारले. आज भाजपा मोदींच्या नेतृत्वाखाली मजबूत स्थितीत आहे, पण राजकारणाइतके चंचल काहीच नसते. लोकांचे मन कधी बदलेल त्याचा भरवसा नाही. असा सूचक इशारा देखील सामानातून सत्ताधाऱ्यांना देण्यात आला आहे.