बंडाळीमुळे जुन्नरमध्ये पराभव : आशा बुचके यांच्या भूमिकेकडे लक्ष
निवृत्तीनगर – विधानसभेतील पराभवानंतर माजी आमदार शरद सोनवणे यांनी सर्व शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यापुढील काळात पक्षबांधणीचे काम करण्याचे आवाहन करून पुढच्या पंचवार्षिकमध्ये जुन्नर तालुक्याचा आमदार हा शिवसेनेचा होणार, असा एल्गार केला आहे. तर आशाताई बुचके ह्या येणाऱ्या काळात कोणती पावले उचलणार? कुठल्या पक्षात जाणार? त्यांची काय ध्येयधोरणे असणार? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’ या म्हणीप्रमाणे मनसेचे माजी आमदार शरद सोनवणे हे शिवसेना पक्षातून उभे राहिले तर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आशाताई बुचके यांनी अपक्ष निवडणूक लढविली या दोघांमधील वाद विकोपाला जाऊन त्याचा फायदा सरळ-सरळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला झाला. नुकत्याच झालेल्या जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अतुल बेनके यांनी जुन्नरची जागा मिळवली आहे. सन 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेतून उभे राहिलेले शरद सोनवणे यांनी मताधिक्य घेऊन महाराष्ट्रातून एकमेव मनसेचे आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी आशाताई बुचके शिवसेनेतून लढा देऊन त्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होत्या, तर अतुल बेनके हे या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर होते.
पाच वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक घडामोडी झाल्यानंतर शिवसेना पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पक्षविरोधी काम केले म्हणून आशाताई बुचके यांची हकालपट्टी केली. दुसरीकडे मनसे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. ह्या गोष्टीमुळे ज्या बुचकेनी गेली अनेक वर्षे पक्षसंघटन करून कार्यकर्ते जपले होते ते बहुतेक शिवसैनिक नाराज होऊन त्यांच्या बाजूने उभे राहिले. या सर्व गोष्टींचा परिणाम नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर झाला.
शिवसेना पक्षात अंतर्गत बंडखोरी होऊन तालुक्यातील अनेक शिवसैनिक बुचके त्यांच्या बाजूने उभे राहिले तर दुसरीकडे शरद सोनवणे यांना पक्षांतर्गत बंडाळी थांबवता आली नाही. त्यामुळे पक्षात फूट पडून याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला झाला ‘विनिंग कॅंडिडेट’ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते व आपणच निवडून येणार असा आत्मविश्वास असणाऱ्या शरद सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
नव्या खासदार, आमदारांची जबाबदारी वाढली
नुकतेच निवडून आलेले खासदार अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांची जबाबदारी वाढली असून त्यांना तालुक्यात रेंगाळलेली पुणे नाशिक महामार्गचे बाह्यवळण रस्त्याचे काम, बिबट सफारी, पर्यटन तालुक्याच्या दृष्टिकोनातून सुधारणा व दाऱ्या घाटाचा प्रश्न, तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही कामे मार्गी लावावी लागणार आहेत व तीच कामे त्यांचा पुढील यशाचा मार्ग सोयीस्कर करू शकतात.
सेनेत बंडाळी, राष्ट्रवादीत एकोपा
सोनवणे व बुचके यांच्यातील भांडणाची माहिती असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने मोठ्या चतुराईने व संपूर्ण नियोजनबद्ध असा आपल्या उमेदवाराचा प्रचार केला. गावोगावी बैठका घेऊन अतुल बेनके हे आमदार म्हणून कसे योग्य आहे? हे पटवून दिले त्यातच अतुल बेनके यांनी निवडणुकांपूर्वी शेवटच्या टप्प्यात जे आंदोलन केले होते. त्याचा सर्वात जास्त फायदा त्यांना झाला.
त्याचप्रमाणे कॉंग्रेस पक्षातून इच्छुक असणाऱ्या सत्यशिल शेरकर यांना समजविण्यात ही त्यांना यश आले. लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. अमोल कोल्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे अशा ह्या त्रिकुटाचीची साथ बेनके यांच्या पाठीशी असल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व मतदारांची मते मिळवण्यात त्यांना यश आले.