शिवसेनेने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. शेवाळे यांच्यानंतर आणखी एका खासदाराने उद्धव ठाकरेंकडे एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचे आवाहन केले आहे. खासदार भावना गवळी यांच्यानंतर इतर खासदार देखील भाजप पूरक भूमिका घेत असल्याचे शिवसेनेत सध्या चिंतेचे वातावरण आहे.
खासदार शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन त्यांना आपले पत्र दिले. त्यानंतर आता पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती ठाकरेंकडे केली आहे. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे. उद्धव ठाकरेंनी मन मोठे करुन त्यांना पाठिंबा द्यावा. त्यांना पाठिंबा दिल्यास संपूर्ण आदिवासी समाज उद्धव ठाकरेंचे स्वागत करेल. मला विश्वास आहे की ते याबाबत निर्णय घेतील, असे राजेंद्र गावित यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवाळे यांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हंटल होत. मात्र आता आमदारांप्रमाणे खासदार देखील भाजपच्या बाजूने जात आहेत ही सेनेसाठी धोक्याची घंटा आहे. अशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.