चंद्रपूर: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना-भाजप यांच्यात युती जाहीर झाली. याचा परिणाम म्हणून चंद्रपुरातील वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर हे शिवसेना पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. बाळू धानोरकर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यासंदर्भात त्यांनी 28 फेब्रुवारीला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची भेट घेतली असल्याचेही समजते.
बाळू धानोरकर आणि हंसराज अहिर यांच्या टोकाचे मतभेद आहेत. युतीमध्ये असताना हंसराज अहिर यांनी आतापर्यंत निवडणुकीत कोणतीही मदत केली नाही, असा आरोप बाळू धानोरकर यांनी केला आहे. त्यामुळे बाळू धानोकरांनी अहिर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
युती झाल्याने निवडणूक लढवणार नसल्याचे बाळू धानोरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. त्यामुळे कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवून हंसराज अहिर यांना आव्हान देण्याची इच्छा धानोरकर यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता बाळू धानोरकर हे देखील शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याने शिवेसेना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.