राष्ट्रवादीकडून सूतोवाच: कॉंग्रेसही सत्तेत सहभागी होण्याची शक्यता
मुंबई : राज्यात सरकार स्थापनेसाठी नवी आघाडी उभी राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. नव्या सरकारच्या स्वरूपाबाबतची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. त्यापार्श्वभूमीवर, नव्या आघाडी सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडेच असेल, असे स्पष्ट सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येण्याचे मन बनवले आहे. स्थिर सरकार देण्याच्या उद्देशातून किमान समान कार्यक्रम निश्चित करण्याच्या प्रक्रियेलाही तिन्ही पक्षांनी गती दिल्याचे दिसते. मात्र, सरकारचे स्वरूप नेमके कसे असेल? मुख्यमंत्रिपद कुणाकडे जाणार, अशा विविध प्रश्नांवरून तर्क-वितर्क सुरू आहेत.
तूर्त तिन्ही पक्षांनी त्याबाबत कुठला सुगावा लागू दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून शुक्रवारी देण्यात आलेल्या माहितीला महत्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे जाणार असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना महायुतीमधून बाहेर पडली. त्यामुळे त्या पक्षाच्या भावनेचा आदर ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे मलिक यांनी नमूद केले.
दरम्यान, नव्या सरकारला कॉंग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, असा अंदाज सुरूवातीला वर्तवण्यात आला होता. मात्र, सरकारच्या स्थैर्यासाठी कॉंग्रेसनेही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा विचार पुढे आला. त्यातून कॉंग्रेसही सत्तेत सहभागी होण्यास राजी झाल्याचे समजते. तिन्ही पक्षांमध्ये सत्ता आणि खातेवाटपाची चर्चाही सुरू झाली असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. आता नव्या आघाडीवर शिक्कामोर्तब करणाऱ्या घोषणेची प्रतीक्षा आहे.