उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची आज बोलावली बैठक
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरु आहे. त्यातच गुरुवारी दिल्लीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये युतीबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आता मुंबईतही वेगवान हालचाली घडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी, उद्या (28 सप्टेंबर) शिवसेनेची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यावेळी उद्धव ठाकरे राज्यातील पदाधिकारी आणि इच्छुकांशी संवाद साधतील.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उद्या सकाळी 11 वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार असून यासाठी दोन्ही पक्षांचे नेते आशावादी असताना उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतील मार्गदर्शनाकडे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे. युती आणि जागा वाटपाच्या फार्म्युलावर अजून अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. मात्र, घटस्थापनेच्या मुहूर्तावर युती आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरी होण्याच्या शक्यतेने “डॅमेज कंट्रोल’साठी पक्ष नेतृत्वावे खबरदारी म्हणून ही बैठक बोलावण्यात आल्याचे बोलले जात आहे. कारण, युतीत निवडणूक लढवताना पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या मर्यादित जागांवर उमेदवारी देताना पक्षनेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप 144, शिवसेना उपमुख्यमंत्रीपदासह 126 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. यापूर्वी 18 जागा मित्रपक्षांना सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे 135-135 जागा लढवण्याचे सूत्र ठरल्याचे बोलले जात होते. शिवसेना आधीपासूनच 50-50 जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. पण त्यामध्ये बदलही केले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अजून शिवसेना आणि भाजपने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण येत्या रविवारी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.