पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी समर्पित वृत्तीने केलेले कार्य, नव्यांना संधी देताना जुन्या कार्यकर्त्यांचा पक्षात ठेवलेला सन्मान, राज्याचा एक एक जिल्हा निवडून तो ताब्यात घेण्यासाठी केलेले जीवाचे रान यामुळे भारतीय जनता पक्ष स्वबळावर राज्यात सत्ता मिळवू शकेल, अशा अवस्थेत पोहोचला. त्याचवेळी संघटनेपेक्षा व्यक्तीनिष्ठेला आलेले महत्व, संघटनेसाठी जीवाचे रान करणाऱ्यांपेक्षा नेतृत्वाभोवतीच्या कोंडाळ्याला आलेले महत्व, सामान्य शिवसैनिक आणि मराठी माणसाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे भारतीय जनता पक्षामागे फरफटत जाण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. युतीच्या 25 वर्षाच्या संसारात भारतीय जनता पक्षाच्या मतात तब्बल 16. 37 टक्क्यांनी वाढ झाली. तर शिवसेनेच्या मतात मात्र अवघ्या 3.04 टक्क्यांनी वाढ झाली. युतीच्या जागावाटपाचा तीढा ऐन जोमात आलेला असतान या दोन्ही पक्षाच्या कामगिरीचा हा धुंडोळा…
मुंबईत गिरणी कामगारांचं वर्चस्व असण्याच्या काळात म्हणजे 1966ला शिवसेनेचा जन्म झाला. त्यानंतर 1970 मध्ये गिरणी कामगारांचे कम्युनिस्ट नेते आणि आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत या हत्येची सहानुभूती मिळवण्यासाठी देसाई यांच्या पत्नी सरोजिनी यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात शिवसेनेने वामनराव महाडिक यांना मैदानात उतरले. केवळ 1 हजार 679 मतांनी का होईना पण विजय खेचून आणला. अशा संघर्षशील शिवसेनेची युतीतील दादागिरी 2014 मध्ये भाजपाने संपुष्टात आणली. या दोन्ही पक्षात 1990च्या निवडणुकी पुर्वी युती झाली. त्यात शिवसेनेने 183 जागा लढवून त्यापैकी 52 जागांवर विजय मिळवला तर भाजपाने 105 जागा लढवत 42 जागा मिळवल्या.
भाजपा सेनेने शरद पवार यांच्यावर तोफ डागत 1995 च्या विधानसभा निवडणूक लढवली. त्यात शिवसेनेने 161 जागा लढवत 73 आणि भाजपाने 117 जाग लढवत 65 जागा जिंकत सत्ता मिळवली. मात्र 1999 च्या निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवण्यात युती अयशस्वी झाली त्यात शिवसेनेने 69 तर भाजपाने 56 जागांवर विजय मिळवला. 2004मध्येही 171-117 जागांचा फार्म्यला कायम होता. त्यात शिवसेनेला 62 तर भाजपला 54 जागा मिळाल्या.
2009मध्ये मात्र दोन्ही पक्षांनी 169-119 जागांचा फॉर्म्युला स्वीकारला. त्यात भाजपचे 46 उमेदवार विजयी झाले. तर सेनेचे 42 आमदार विधीमंडळात पोहोचले. यावेळी भाजपा प्रथमच शिवसेनेपेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यात यशस्वी ठरला. 2014 मध्ये पुन्हा युतीच्या जागांबाबत शिवसेनेने ताठर भूमकिा घेतली. त्यामुळे भाजपाने युती मोडली.
भाजपाने आपला पक्ष वाढवताना अनेक गोष्टी केल्या गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांसारख्या नेत्यांनी हा पक्ष तळागाळापर्यमत पोहोचवला. पक्षाने एकनाथ खडसे, नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांना पुढे आणून भटा बामणांचा पक्ष अशा केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर दिले. त्याच बरोबर पक्षाशी निष्ठावान कार्यकर्त्यांना बळ दिले. स्वबळावर जिथे विजय मिळेल तिथे तो मिळवलाच. मात्र, जेथे ताकद कमी पडत होती तेथे बाहेरील माणसांना उमेदवारी दिली. त्यावेळी तेथील स्थानिक कार्यकत्यांना पक्षात महत्वाची पदे दिली. त्यामुळे येवढे जण पक्षात येऊनही पक्षात बेदिली माजली नाही.पक्ष एकसंध राहिला.
भाजपाची ही वाढ होत असताना पक्षाला रसद पुरवण्याचे काम अभाविपच्या मार्फत केले. त्यामुळे तरुणांचा ओढा पक्षाकडे कायम राहिला. आपला हिंदुत्ववादी चेहराही या पक्षाने कायम ठेवला. तरूणांचा कल लक्षात घेऊन त्यांनी विकासाची भाषा कायम ठेवली.