पटियाला – पंजाबमधील पटियाला येथे शिवसेनेने काढलेल्या खलिस्तान मुर्दाबाद मोर्चादरम्यान अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही गटांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला. यावेळी दोन्ही बाजूंकडून तलवारी उपसण्यात आल्या तसेच दगडफेकही झाली. या घटनेची दखल घेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट केले आहे.
‘पटियाला येथील संघर्षाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी डीजीपींशी बोललो, परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि कोणालाही राज्यात अशांतता निर्माण करू देणार नाही. पंजाबची शांतता आणि सद्भावना सर्वात महत्त्वाची आहे.” असं ट्विट मुख्यमंत्री मान यांनी केलं.
नेमकं काय घडलं?
पटियाला येथे शिवसेनेचे पंजाब कार्याध्यक्ष हरीश सिंगला यांच्या देखरेखीखाली आर्य समाज चौकातून खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा निघाला. खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसैनिक बाहेर पडले. यावेळी हरीश सिंगला म्हणाले की, शिवसेना पंजाबमध्ये कधीही खलिस्तान होऊ देणार नाही आणि खलिस्तानचे नाव घेऊ देणार नाही. हा मोर्चा सुरु असतानाच काही शीख संघटनाही तलवारी घेऊन रस्त्यावर उतरल्या यामुळे दोन्ही बाजूंनी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि दगडफेकही झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, पटियालाचे डीसी साक्षी साहनी यांनी, ‘काही वाद किंवा गैरसमज असतील तर ते संवादातून सोडवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मी पटियाला आणि पंजाब जिल्हा प्रशासनाच्या सर्व बंधू-भगिनींना शांतता आणि बंधुभाव राखण्याचे आवाहन करतो. सध्याची परिस्थिती नियंत्रणात असून, त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. शांतता राखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. निराधार बातम्या/सोशल मीडिया फॉरवर्डच्या फंदात पडू नये आणि आपापल्या घरी आणि मुक्कामाच्या ठिकाणी परत जा’ अशी विनंती केली.