मुंबई – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेची वाटचाल नेमकी कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. आगामी राजकीय वाटचालीसाठी शिवसेनेने आता संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना याबाबतची घोषणा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाईसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.
छोटे पक्ष, संघटना जर वाचवायच्या असतील तर एकत्र यावे लागले, यावर आमचे एकमत झाले आहे. शिवराय, शाहू, फुले,आंबेडकर,संविधान याला मानणाला नवतरुण तयार करणे यासाठी आम्ही काम करू. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकत्र लढण्याची तयारी केली जाणार आहे, असे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू”, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली.