शिवसेनेचा इशारा : टोलवसुली बंद आंदोलन
कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्गावरील मोठ्या प्रमाणावरील खड्डे आणि त्यामुळे संपूर्ण महामार्गाची झालेली चाळण यातून या रस्त्याची अवस्था फाटक्या नोटे सारखी झाली आहे. मग, टोलवसुली करताना फाटक्या नोटा घेणार का? सुविधांची वानवा आणि प्रवाशांचा जीव रामभरोसे, अशी अवस्था असताना टोलवसुली कशासाठी? असे सवाल करीत दि. 31 डिसेंबरपर्यंत महामार्गाची कामे पूर्ण करण्यात आली नाही तर कायदा हातात घेऊन खेडशिवापूर टोलनाका बंद पाडू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील रखडलेले रुंदीकरण पूर्ण करावे तसेच स्थानिकांना टोल माफी करावी, आदी मागण्यांसाठी खेडशिवापूर (ता. हवेली) येथील टोलनाक्यावर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे यांच्या नेतृत्वाखाली टोलवसुली बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, अमोल पांगारे, भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, दीपक बर्डे, मुळशी तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, वेल्ह्याचे माजी तालुकाप्रमुख दतात्रय देशमाने, लाला रेणुसे, आदित्य बोरगे, विलास पांगारे, नंदू खुळे, बाळासाहेब देशपांडे, गणेश धुमाळ, महिला आघाडी संपर्क संघटिका स्वाती ढमाले, दीपक करंजावणे, सचिन पालसकर, बुवा खाटपे, नारायण पांगारकर, प्रमोद शिळीमकर, अमोल मोकाशी, नारायण कोंडे, अशोक वाडकर, राजेंद्र दामगुडे, दादा माने, सुशांत भोसले, अंकुश चोरघे, दिनकर पिसे, अशोक पांगारे, सरपंच विकास चव्हाण, विक्रांत भोरडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
पुणे-सातारा रस्त्यावर महामार्गावर चालकांना शनिवार, रविवार तसेच सलग सुट्ट्यांच्या दिवसात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासह रोज टोल नाक्यावरील रांग मोठी होत आहे. महामार्ग प्रशासनाचा धिम्या गतीने कारभार सुरू आहे. त्यातच महामार्गावरील खड्डे, रस्त्यांची अधर्वट कामे, पुलांची अर्धवट कामे यासह पुणे-सातारा मार्ग जीवघेणा ठरत आहे. कात्रज बोगदा ते शिरवळ या रस्त्यावर प्रवास करणे नकोसे झाले आहे. टोल भरून नागरिकांना कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाही, त्यामुळे या टोलविरोधात नागरिकांच्या तीव्र भावना आहेत.अशाही स्थितीत प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने पाहत नाही, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
पोलिसांनी घडवली सामोपचाराची चर्चा
राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी महामार्गाचे अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये सामोपचाराची चर्चा घडवून आणली. यावेळी एनएचआयचे सुहास चिटणीस व रिलायन्सचे व्यवस्थापक बी. के. सिंग यांनी दिलेल्या मुदतीच्या आत अपूर्ण कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.