शिवराज्याभिषेक दिन : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ‘प्रजा सुखी तरच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. राजनीती, युद्धनीती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन, कुशलतेसह भविष्याचा वेध घेण्याचे द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव मार्गदर्शन व प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना त्रिवार वंदन केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आज, पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये 'शिवराज्याभिषेक दिना'निमित्त युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन केलं. सर्वांना #शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा! pic.twitter.com/JKrF5s7BhV
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 6, 2020
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांच्यासारखा महामानव एकदाच जन्म घेतो आणि अखिल मानवजातीचे कल्याण करुन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेले कार्य अलौकिक आहे. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवली. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात, स्वाभिमानाचे, स्वराज्याचे बीज रुजवले. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आपले वाटेल, जिथे सर्वांना न्याय मिळेल असे स्वराज्य निर्माण केले. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना स्वाभिमान दिला. शिवराज्याभिषेकाने महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. त्यांच्यासारखा राजा मिळाला म्हणूनच शिवराज्याभिषेक दिनाचे आपल्या जीवनात सर्वाधिक महत्त्व आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वंदन करत असताना त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करुन राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा दिल्या.