रायगड: दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यंदा मात्र करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
करोना महामारीचे संकट पाहता समाजहीत डोळ्यासमोर ठेवून शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे. सोहळा साधेपणाने साजरा होईल, असे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्यावतीने दरवर्षी 6 जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिवभक्तांच्या सहकार्याने 2008 साली मेघडंबरीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली.
शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशाच्या काना-कोपऱ्यातून शिवप्रेमी मोठया संख्येने रायगडावर येतात. परदेशी पाहुणे सुद्धा यामध्ये असतात. रायगडावर यावेळी वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. पण यंदा मात्र करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा सोहळा साजरा होणार आहे.