नवी दिल्ली – ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा सत्र न्यायालयात घेण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. आता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. ज्ञानवापी प्रकरणाची आज (शुक्रवारी) तिसऱ्यांदा सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्या. सूर्यकांत आणि न्या. पी एस नरसिंहा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, या प्रकरणी अनुभवी न्यायाधिशांनी सुनावणी करावी, असे आम्हाला वाटते. सध्या सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांवर आम्हाला काही आक्षेप नाही. परंतु जास्त अनुभवी न्यायाधिशांनी जर हे प्रकरण हाताळले तर याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार आहे. मंदिरात पुजा करण्याप्रकरणी देखील जिल्हा न्यायाधिशांनी लक्ष द्यावे.
जिल्हा न्यायाधिश मशिद कमिटीची याचिकेवर देखील निर्णय घेतील की, त्यांचा दावा किती मजबूत आहे. तोपर्यंत शिवलिंग क्षेत्राची सुरक्षा आणि तसेच मुस्लिम बांधवांना नमाज पठण करताना कोणतीही अडचण येणार याची काळजी घ्यावी. या प्रकरणी सुनावणी सुरू करण्यास न्यायालयाने आठ आठवड्याचा वेळ दिला आहे. तोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या 17 मे च्या अंतरिम आदेशाचे पालन करावे, असे निर्देशही दिले आहेत.