सातारा – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची सातारा-पुणे टप्प्यात खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांना या समस्येशी देणेघेणे नाही. वारंवार निवेदने देऊन आणि चर्चा करूनही रस्ता नीट होत नसल्याने जनता त्रस्त आहे. सातारा-पुणे मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी.
टोल नाक्यांवर आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात अन्यथा टोल नाका बंद करावा, अशा मागणीचे निवेदन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या संदर्भात लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याचे आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा-पुणे या टप्प्यातील जीवघेणा प्रवास आणि सक्तीच्या टोलवसुलीविरोधात सातारकर जनता पेटून उठली आहे. आ. शिवेंद्रराजे यांनीही या प्रश्नावर आवाज उठवला आहे. उद्या (बुधवारी) आनेवाडी येथे टोलबंद आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, त्यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. रस्त्याची दुरुस्ती, टोल नाक्यावरील सोयीसुविधा पुरवणे याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास हे काम जमत नसेल तर या रस्त्यावर टोलवसुली बंद करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सातारा-पुणे मार्गाची दरवर्षी खड्ड्यांमुळे चाळण होत आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे रोज छोटे-मोठे अपघात होत असून त्यामध्ये अनेक बळी जात आहेत. अनेक जण कायमचे जायबंदी होत आहेत. या रस्त्यावर जीवित व वित्तहानी होत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. ठेकेदार कंपनीसही लोकांच्या जीविताची पर्वा नाही.
दळणवळणासाठी दर्जेदार महामार्ग असावा, प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी टोलवसुली आहे की, ठेकेदाराचे इमले उभे करण्यासाठी आहे, हेच कळेनासे झाले आहे. सातारा-पुणे मार्गावरील सातत्याने खड्ड्यांमुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. |
सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी संपादित झाल्या आहेत. असे असताना आनेवाडी टोल बूथवर भूमिपुत्रांनाही टोलसाठी अरेरावी आणि दमदाटी होत आहे. सातारा शहर आणि सातारा व जावळी तालुक्यातील गावांमधील लोकांना भुईंज, पाचवड, वाई, जोशी विहीर, सुरुर आदी ठिकाणी सातत्याने ये-जा करावी लागते.
त्यांनाही टोल द्यावा लागतो. भूमिपुत्रांच्या जमिनी घेऊनही त्यांच्याकडून केली जाणारी टोलवसुली अन्यायकारक आहे. त्यामुळे महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी. महामार्गावर सोयीसुविधा पुरवाव्यात अन्यथा टोलवसुली बंद करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी या निवेदनात केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी लवकरच यासंदभांत बैठक बोलावून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.