पक्षांतराचा परिणाम नाहीच; दीपक पवारांना मतदारांनी पुन्हा नाकारले
सातारा – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू झाली. त्यानंतर उदयनराजेंनीही खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघावर पोटनिवडणूक लादली गेल्याने येथील लढतीला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व आले.
त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याने लोकसभा पोटनिवडणुकीबरोबर सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात नेमका काय निकाल लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे ही निवडणूक शिवेंद्रराजेंसाठी प्रतिष्ठेची बनली होती. मात्र, निवडणुकीच्या निकालावरून सातारा-जावळी मतदारसंघावर शिवेंद्रराजेंनी आपली मांड अधिक पक्की केल्याचे सिद्ध झाले आहे. शिवेंद्रराजेंच्या पक्षांतराचा मुद्दा कळीचा बनवण्याचा विरोधकांचा प्रयत्न मतदारांनी हाणून पाडत भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या दीपक पवारांना पुन्हा नाकारले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवेंद्रराजे भोसले यांनी “घड्याळ’ सोडून “कमळ’ हातात घेतले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने भाजपमधून आलेल्या दीपक पवार यांना रिंगणात उतरवले. राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा निवडून गेलेल्या शिवेंद्रराजे यांनी भाजपच्या तिकिटावर चौथ्यांदा बाजी मारली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांनी 97 हजार 964 मते मिळवून त्यावेळी भाजपकडून लढणाऱ्या दीपक पवार यांना पराभूत केले होते. तेव्हा दीपक पवार यांना 50 हजार 151 मते मिळाली होती.
त्यानंतर दीपक पवारांनी 2019 चे लक्ष्य ठेवून मतदारसंघात पाच वर्षे काम केले. गावागावात भाजपच्या संघटनेची बाधंणी केली. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना पश्चिम महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या रूपाने राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. मात्र, आपला विरोध डावलून भाजप नेतृत्वाने शिवेंद्रराजेंना पक्षात घेतल्याने आपली उमेदवारी कापली जाणार, या चिंतेने दीपक पवार यांनी शिवेंद्रराजेंविरोधात बंडाचे निशाण फडकावले तरीही पक्षाने दाद न दिल्याने शेवटी त्यांनी राष्ट्रवादीची कास धरली. त्यामुळे 2014 साली झालेली लढत यंदाही सातारकरांना पाहायला मिळाली.
फरक एवढाच की, उमेदवारांचे पक्ष आणि चिन्हे बदलली. निवडणूक प्रचारात शरद पवार, श्रीनिवास पाटील, जयंत पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोफा मतदारसंघात धडाडल्याने दीपक पवारांना आपणच आमदार होणार, असा विश्वास वाटू लागला. मात्र, शिवेंद्रराजे भोसले यांनी आपण केलेल्या विकासकामांची यादी मतदारसंघातील पायाभूत सुविधा, एमआयडीसी, वैद्यकीय महाविद्यालय यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती गावागावातील लोकांपुढे सादर केली. मतदारसंघाच्या विकासासाठीच पक्ष बदलल्याचे मतदारांना पटवून देण्यातही ते यशस्वी ठरले. त्यामुळेच मतदारांनी सकारात्मक कौल दिल्याने शिवेंद्रराजे चौथ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांना एक लाख 17 हजार 334 तर दीपक पवारांना 74 हजार 80 मते मिळाल्याने या मतदारसंघातील जनतेने शिवेंद्रराजेंच्या बाजूनेच स्पष्ट कौल दिल्याचे स्पष्ट झाले.
शिवेंद्रराजेंना मंत्रिपद मिळणार?
राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता पुन्हा आल्याने सातारा जिल्ह्याला गेल्या वेळी हुलकावणी देणारा लाल दिवा यावेळी मिळणार, अशी आशा मतदारांना आणि शिवेंद्रराजे समर्थकांना आहे. शिवेंद्रराजेंना राज्य मंत्रिमंडळात मानाचे स्थाने देऊन त्यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व सोपवले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
वेदांतिकाराजेंचे “परफेक्ट’ नियोजन
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. पदयात्रा, गावभेटी, कोपरा सभा या सगळ्यांचे त्यांनी काटेकोर नियोजन केल्यानेच शिवेंद्रराजेंना मतदारसंघात फिरता आले. वेदांतिकाराजे यांनी गेले दोन महिने केलेले नियोजनच कामी आल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.