सातारा – परळी गटातील बहुतांशी भाग हा दुर्गम असून अनेक गावांमध्ये विकासकामे करून नागरिकांना सोयी सुविधा पुरविल्या आहेत. त्याचबरोबर अनेक प्रश्न व समस्या मार्गी लावलेल्या आहेत. यापुढेही जनतेसाठी अविरत कार्यरत राहणार आहे. या भागात रस्त्यांचे जाळे विणले असून ठिकठिकाणी पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीप्रश्न सोडवला आहे. भाजपच्या माध्यमातून निवडून आल्यास सकारात्मक बदल होतील. त्यामुळे परळी गटाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी मला साथ द्या.
काहीही झाले तरी विकासगंगा कायम वाहती ठेवून परळी भागाचा कायापालट करणार असल्याची ग्वाही भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. परळी गटातील करंडी, झरेवाडी, पोगरवाडी, आरे-दरे, राजापुरी, बोरणे, आंबळे, गजवडी, अंबवडे खुर्द आदी भागाचा दौरा करत शिवेंद्रसिंहराजेंनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
याप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिकूभाऊ भोसले, राजू भोसले, विद्यमान सदस्या कमलाताई जाधव, पंचायत समिती सदस्य अरविंद जाधव, सौ. विद्या देवरे, मार्केट कमिटीचे संचालक श्रीरंग देवरुखे, नगरसेवक धनंजय जांभळे, जयराम चव्हाण, बबन देवरे, अभय पवार, रविंद्र काटकर, विनोद निपाणे, शंकर चव्हाण, बापू मोहिते, सुरेश सावंत, शशिकांत दगडे, सिताराम भोसले, जीवन मोरे, मंगेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
राजू भोसले म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नामुळे भाजप सरकारने कॉंक्रिटीचे रस्ते, एमआयडीसीमध्ये नवीन मोठ्या कंपन्या, मेडिकल कॉलेज, जावलीतील बोंडारवाडी धरण आदी कामे तातडीने मंजूर करून घेऊन विकासाचे पर्व उभारले आहे. जनतेचे पाठबळ हीच बाबाराजेंची शक्ती असून मतदार संघातील विकास व सर्वसामान्यांचे प्रश्न बाबांनी नेहमी सोडवले आहेत. त्यांना सर्वसामान्य नागरिकाची जाण आहे. जिथे माणुसकी तेथे विजय निश्चित असतो. यावेळीही बाबाराजे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील आणि विकासगंगा अविरत प्रवाही राहील, यासाठी परळी भागातून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन राजू भोसले यांनी केले.