– अमरसिंह भातलवंडे
पिंपरी – राज्यातील जनतेला अवघ्या दहा रुपयात जेवण देण्याच्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेला येत्या 26 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. प्रत्यक्ष गरजू लोकापर्यंतच या योजनेचा लाभ पोहचावा, यासाठी वेगवेगळ्या पर्यायाची चाचपणी करण्यात आल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होती. मात्र, सर्व बाबींची शक्यता खुद्द मंत्र्यांनीच नाकारली होती. त्यामुळे, आता शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी “फोटोच’ लाभधारकांचा “आधार’ ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवभोजन थाळीचा लाभ कोणी घेतला, कसा घेतला याचा पुरावा म्हणून मोबाइलवरच्या शिवभोजन ऍपवर मोठी जबाबदारी पडणार आहे. शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाचे छायाचित्र या ऍपवरुन ठेकेदाराला घ्यावे लागणार आहे. थाळीचा लाभ घेण्याऱ्या प्रत्येकाचे छायाचित्र घेतल्यानंतरच संबधित व्यक्तीला थाळी दिली जाणार आहे.
राज्य सरकारच्या महत्वकांक्षी शिवभोजन थाळी योजना 26 जानेवारी पासून सुरु होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी दररोज 500 थाळीचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कामानिमित्त येणाऱ्यांना अत्यल्प दरात जेवण मिळावे आणि त्यांची परवड होऊ नये म्हणून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
प्रत्यक्ष गरजूंपर्यंत योजनेचा लाभ पोहचावा, यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे, आता थाळीचा लाभ घेणाऱ्याचे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र किंवा रेशनकार्ड असे कोणतेही बंधन लादण्यात येणार नाही. लाभार्थीचे मोबाइलवर घेतले जाणारे छायाचित्र हाच महत्वाचा शासकीय पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. शासकीय कर्मचारी व सधन व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यापेक्षा सर्वसामान्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
उद्या दि. 26 जानेवारीपासून ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. गरजूंना अवघ्या दहा रुपयात जेवण मिळणार असले तरी या थाळीमागे 40 रुपयाचे अनुदान शासन शिवभोजनच्या ठेकेदाराला देणार आहे. त्यामुळे, प्रत्यक्ष ही थाळी 50 रुपयांची आहे. संबंधित केंद्रावर “प्रथम येईल त्याला प्राधान्य’ या पद्धतीने थाळी देण्यात येणार आहे. शिवभोजन थाळीमध्ये दोन चपाती, भाजी, भात व आमटीचा समावेश आहे. तसेच दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेतच ही थाळी मिळणार आहे.