फुरसुंगी : छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वबंधुत्व, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, संरक्षण अशा सर्वच मानवतावादी लोककल्याणकारी तत्त्वांचे पालन केले. परंतु, शिवरायांचा हा ज्ञान देणारा विचार 21व्या शतकातसुद्धा प्रभावीपणे पुढे येत नाही. इतिहासातील मोजके रंजक प्रसंग लोकांच्या पुढे मांडण्यापेक्षा त्यांच्या लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा प्रचार-प्रसार झाल्याशिवाय खरे शिवराज्य स्थापन होणार नाही, असे मत इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी व्यक्त केले.
अखिल फुरसुंगी शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा आणि फुरसुंगी गावच्या भूमिपुत्रांचा जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी इतिहास संशोधक संशोधक दत्ताजी नलावडे बोलत होते.
शिवव्याख्याते महेश टेळे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर तुपे, कैलास आवारी, उत्तम कामठे, मारुती काळे, विवेक तुपे, संदीप लहाने, गोरख कामठे आदी उपस्थित होते.
फुरसुंगी गावचे भूषण व नोबेल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एम. बी. अबनावे, निवृत्त डीवायएसपी प्रकाश देशमुख, जय मल्हार उद्योगसमूहाचे संचालक विशाल कामठे यांना छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार आणि माजी मुख्याध्यापिका सुनंदा हरपळे व माजी मुख्याध्यापक सुलोचना काळाणे यांना राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन रवींद्र हरपळे आणि योगेश शिंदे यांनी आभार मानले.