शिराळा – आ. शिवाजीराव नाईक हे प्रामाणिक काम करणारे व्यक्तिमत्व आहे. सत्यजित देशमुख यांची ताकद आ. शिवाजीराव नाईक यांना मिळाल्याने आता शिराळा विधानसभा मतदारसंघात आ. शिवाजीराव नाईकच निवडून येणार हे कोणा ज्योतिषांने सांगण्याची गरज नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कामेरी, ता. वाळवा येथे महायुतीचे उमेदवार आ. शिवाजीराव नाईक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजय पाटील, सत्यजित देशमुख, आ. पृथ्वीराज देशमुख, आ. प्रसाद लाड आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंधरा वर्षात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने काय केले, याचा लेखोजोगा त्यांनी मांडावा आणि आम्ही पाच वर्षात काय केले हे सांगतो. आघाडी सरकारच्या पंधरा वर्षापेक्षा आम्ही पाच वर्षात महाराष्ट्रात दुप्पटीने विकासकामे केलीत. आघाडी सरकारच्या काळात निधी अभावी रखडलेली वाकुर्डे बुद्रुक योजना युतीच्या सरकारने 350 कोटी रुपये उपलब्ध करुन पुन्हा कार्यान्वित केली.
यामुळे 45 हजार एकर जमिन ओलिताखाली येणार आहे. ताकारी, टेंभू, म्हैसाळ या योजनाही आघाडी सरकारने रेंगाळत ठेवल्या. या योजनांनाही आम्ही गती दिली आहे. आघाडी सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्राने मंत्रिमंडळामध्ये येथील डझनभर मंत्री पाठविले. परंतु या योजना पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत.
विधानपरिषदेचे माजी सभापती स्व. आ. शिवाजीराव देशमुख तत्वांनी राजकारणात राहिले. परंतु स्व. देशमुखसाहेबांच्या अंतिम क्षणात राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना अपमानित केले. आम्ही सरकारच्यावतीने कोकरूड येथे स्व. शिवाजीराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारणार आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले, कराड, सांगली, कोल्हापूर आज पुरामुळे अनेक घरे, जमिनी, शेती वाहून गेल्या. परंतु आता आम्ही पुराचे वाहून जाणारे पाणी हे दुष्काळी भागामध्ये कॅनॉलद्वारे नेणार आहे. यासाठी वर्ल्ड बॅंक मदत करणार आहे.
आ. शिवाजीराव नाईक म्हणाले, युवा नेते सत्यजित देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली आहे. स्व. शिवाजीराव देशमुखसाहेब यांच्यामुळे शिराळा तालुका व वाळवा तालुक्यातील गावे डोंगरी विभाग म्हणून घोषित झाली. या भागाला चांदोली पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावे, हिंदकेसरी कै. पै. गणपतराव आंदळकर यांच्या नावे कुस्ती केंद्र व पुनवत या गावी त्यांचेही स्मारक व्हावे. वारणा प्रकल्प जलाशयात गेलेली अनेक गावांचे पुनर्वसन व्हावे, व्याघ्र प्रकल्पातील बाधित 14 गावांना अद्यापही काहीच मिळालेले नाही. याचाही सरकारने विचार करावा, असेही नाईक यांनी सांगितले.
सत्यजित देशमुख म्हणाले, 1995 स्व. शिवाजीराव देशमुख यांचा विचार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या प्रेरणेने व नेतृत्वाखाली भाजपाच्या कमळाच्या झेंड्याखाली आणला आहे. स्व. देशमुख यांच्या अंतिम काळात शरद पवार यांनी अपमानास्पद पदावरून घालवले, हे मी कधीच विसरणार नाही. म्हणून मी भाजपामध्ये आलो. आ. शिवाजीराव नाईक यांना विधानसभेत भरघोस मतांनी पाठवणार आहे.
यावेळी सम्राट शिंदे, राजाराम गरूड, सी. एच. पाटील, अशोक जाधव, संपतराव देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास गौरव नायकवडी, रणजितसिंह नाईक, महादेव कदम, राजाराम गरूड, तानाजी कुंभार, जयकर कदम, हणमंत पाटील, के. डी. पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार हणमंत पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन विनायक गायकवाड यांनी केले.
तुमच्या मनात आहे ते करणार
सत्यजित देशमुख हे माझे बंधू आहेत. राजकारणात स्व. शिवाजीराव देशमुख कॉंग्रेस पक्षात प्रामाणिकपणे राहिले. कॉंग्रेसचे आणि आमचे कधी पटले नसेल. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात स्व. देशमुख यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमठवला. त्यांनी तत्वाच राजकारण केले.
समाजकारणाचे राजकारण केले. विरोधाला विरोध म्हणून कधीच त्यांनी राजकारण केले नाही. स्व. साहेबांना अंतिम क्षणी ज्यांनी ज्यांनी अपमानास्पद वागणूक देवून पदावरून उतरवले. त्याच विधानपरिषदेमध्ये सत्यजित देशमुख यांना सन्मानाने पाठवणार आहे. तुमच्या मनात आहे ते करणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.