शिवाजीराव आढळराव पाटील : आभार मेळाव्यात शिवसैनिकांना खचून न जाण्याचे आवाहन
मंचर – खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्य शिवसैनिकांच्या मनांमध्ये आहे. यापुढील सर्व निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी खचून न जाता प्रामाणिकपणे पक्षासोबत काम करावे. भविष्यात आपलाच विजय असल्याची ग्वाही शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
वडगाव काशिंबेग फाटा (ता. आंबेगाव) येथील मंगल कार्यालयात शिवसेना, भाजप, आरपीआय आणि मित्र पक्षाचा आभार मेळावा झाला. त्यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आढळराव पाटील बोलत होते. यावेळी सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, सरपंच दत्ता गांजाळे, सुनिल बाणखेले, देविदास दरेकर, ज्ञानेश्वर खंडागळे, प्रविण थोरात पाटील, वसंतराव बाणखेले, सागर काजळे, संतोष डोके, मालती थोरात, शिवाजी राजगुरु आदी मान्यवर उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, विधानसभेच्या तीन निवडणुकांवर नजर टाकली तर 30 हजार मतांची नेहमीच शिवसेनेच्या उमेदवाराला विजयासाठी उणीव भासते. ती दुरूस्त करण्यासाठी गावनिहाय बुथ, पक्षसंघटना, महिला संघटना, युवासेना पदाधिकाऱ्यांनी पक्षसंघटना मजबुतीसाठी लक्ष देणे गरजेचे आहे. उमेदवार राजाराम बाणखेले यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक जिंकण्यासाठी मोठा खर्च केला. त्यातुलनेने आपण पैशाने कमी पडलो.
राजाराम बाणखेले म्हणाले, युद्ध, प्रेम यामध्ये हारजीत असते. पैसा, सत्तास्थाने याचा पुरेपूर वापर समोरील उमेदवाराने केल्यानंतर ते विजयी झाले.
माझा व्यक्तीगत खर्च 10 ते 15 लाख रुपये झाला. काही आढळराव पाटील यांनी खर्च केले. त्यामुळे 60 हजार मते मिळाली. यापुढील काळात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, बाजार समिती, शरद बॅंक, मंचर ग्रामपंचायतीसह 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी शिवसैनिकांनी मरगळ झटकून कामाला लागावे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, तालुकाप्रमुख अरुण गिरे, सचिन बांगर, महेश ढमढेरे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन राजू काळे यांनी केले. अजित चव्हाण यांनी आभार मानले.
आदित्य ठाकरे जिल्ह्यात लक्ष घालणार –
पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या झालेल्या पीछेहाटीबाबत माझी शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या बळकटीसाठी आदित्य ठाकरे यांचे विशेष लक्ष पुणे जिल्ह्याकडे यापुढील काळात असणार आहे.
पराभव होणार हे गृहीत धरले होते -बाणखेले
आंबेगाव विधानसभा निवडणुकीत पराभव होणार आहे, हे माहीत होते. तसे मी गृहीत धरले होते. माझी बायको आणि मुलांबरोबर चर्चा व्हायची; परंतु पराभवाने मी खचलो नाही. असा गौप्यस्फोट पराभूत उमेदवार राजाराम बाणखेले यांनी केला. पराभव झाल्यामुळे मी घरी बसलो नाही. शिवसेना नेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना बांधणी करून शिवसैनिकांचा उत्साह वाढविण्याचे काम यापुढील काळात करणार आहे.