पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज शुक्रवारपासून पुन्ह एका सत्रात सुरू राहणार आहे. उद्यापासून (शुक्रवार, दि. 19 जून) सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन कार्यप्रणालीत काही दुरुस्ती केली आहे. त्यानुसार सत्र न्यायालयातील कामकाज फक्त सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. न्यायालयात फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 8 जूनपासून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील न्यायालयांचे कामकाज सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये सुरु ठेवण्यात आले होते. त्यावेळी निकालावर आलेल्या, गुन्ह्यातून वगळण्याच्या आणि जामिनाच्या प्रकरणांची सुनावणी होणर होती. मात्र, शहरातील करोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता न्यायलयीन कामकाज सकाळच्या सत्रात सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयात फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी ठेवण्यात येणार आहे.
अशी माहिती पुणे बार असोसिशएनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक, उपाध्यक्ष ऍड. सचिन हिंगणेकर, ऍड. योगेश तुपे, सचिव ऍड. घनश्याम दराडे आणि ऍड. विकास बाबर यांनी दिली. न्यायालयात फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होणार असून पक्षकारांनी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन पुणे बार असोसिशनकडून करण्यात आले आहे. न्यायालयात होणारी गर्दी आणि संसर्गाला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. न्यायालयीन आवारात फक्त महत्त्वाच्या कामकाजासाठी येणारे पक्षकार आणि वकिलांची तापमापकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. जंतुनाशकाचा वापर करण्यात येत आहे. मास्क वापरणे बंधनकारक आहे.