आजपासून केवळ सकाळच्या सत्रातच सुनावणी होणार
पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज शुक्रवारपासून (दि. 19 जून) पुन्हा एका सत्रात सकाळी सुरू राहणार आहे. यात फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन कार्यप्रणालीत काही दुरुस्ती केली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 8 जूनपासून पुणे महापालिका हद्दीतील न्यायालयांचे कामकाज सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये सुरू होते. त्यावेळी निकालावर आलेल्या, गुन्ह्यातून वगळण्याच्या आणि जामीन प्रकरणांची सुनावणी होणार होती. मात्र, शहरातील करोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता वरील बदल केला आहे, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक, उपाध्यक्ष ऍड. सचिन हिंगणेकर, ऍड. योगेश तुपे, सचिव ऍड. घनश्याम दराडे आणि ऍड. विकास बाबर यांनी दिली.
दरम्यान, पक्षकारांनी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशनकडून करण्यात आले आहे. न्यायालयात होणारी गर्दी आणि संसर्गाला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. न्यायालयीन आवारात फक्त महत्त्वाच्या कामकाजासाठी येणारे पक्षकार आणि वकिलांची तापमापकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. जंतुनाशकाचा वापर करण्यात येत आहे. मास्क वापरणे बंधनकारक आहे.