सचिन दसपुते
गोपाळपूर – राज्यात सर्वदूर पडलेल्या दुष्काळामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. 1972 साली गोदावरी नदीवर जायकवाडी धरण उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी या परिसरातील शेकडो गावांचे स्थलांतर करण्यात आले. पूर्वी या गावात असलेले मंदिर, वाडे, घरे, पेठा आदी त्या गावातच राहिल्या. त्यानंतर पाण्याखाली गेल्या.
आता हीच गावे उघडे पडल्याने त्या ठिकाणी असलेले मंदिर, घरे, वास्तू यांना भेट देण्यासाठी कुतूहल म्हणून, आपल्या देवावरती श्रध्दा म्हणून, महाराष्ट्रभरातून व पूर्वी या गावात राहात असलेल्या लोकांची मांदियाळी या ठिकाणी आली आहे. तरूण पिढीला यांचे आकर्षण, कुतूहल असल्याने ते मोठ्या संख्येने एकत्रित येथे भेटी देत आहे.
शिवना-गोदावरी या दोन नद्यांचा संगम पूर्वी असलेल्या सावखेडा (आता नवीन सावखेडा गंगापूर तालुक्यात आहे) या गावात झाला आहे. सावखेडा गावालगत तुळजापूर, जोगेश्वरी, रामडोह हे गावे होती. यानंतर या गावांचे स्थलांतर झाले. आज तब्बल 48 वर्षानंतर ही गावे उघडी पडली आहे.
या संगमेश्वराच्या मंदीरामध्ये महानुभव पंथाचे लोक आपल्या परंपरेने दंडवत घालण्यासाठी येत आहे. यामुळे या परिसरात प्रचंड गर्दी वाढली असून नारळ, पानफुल, साडी चोळी बरोबर हॉंटेल व्यवसायकांनी आपल्या दुकाना थाटल्या आहे. भाविकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी कहार समाज्यातील लोकांनी होडीचा व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे भाविक पाण्यामधून प्रवास करून आनंद लुटत आहे. जुन्या काळातील गाव, घरे, जुने वाडे, मंदिर याविषयी कुतूहल असल्याने येथे गर्दी होत आहे.