भारतीय जनता पक्षाला जय महाराष्ट्र करत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात घड्याळ बांधून सत्तेचा सोपान चढल्यापासून शिवसेनेच्या भूमिकांमध्ये आमूलाग्र म्हणावा असा बदल झाल्याचे दिसून येत आहे. आजवर ज्या मुद्द्यांवर मुखपत्रामधून किंवा पत्रकार परिषदांमधून उद्धव ठाकरे, संजय राऊत आसूड ओढायचे, कडवी टीका करायचे, कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य काही पक्षांना लक्ष्य करायचे त्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ आज शिवसेना उतरताना दिसत आहे. तसे पाहता याची सुरुवात 2014 नंतरच झाली होती. हळूहळू भूमिकेतील हा बदल गडद होत गेला आणि भाजपावर टीकाटिप्पणीची धार वाढत गेली. तरीही जेव्हा मुद्दा हिंदुत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा किंवा राष्ट्रवादाचा असायचा तेव्हा शिवसेना भाजपाच्या सुरात सूर मिसळून बोलताना दिसली.
आता मात्र शिवसेनेने सेक्युलर बाणा घेतला आहे. हे शिवसेनेचे नवे रूप आहे, नवा चेहरा आहे. त्याच्या कारणांचा वेध घेतानाच शिवसेनेच्या आजवरच्या प्रवासातील अशा महत्त्वाच्या टप्प्यांची आणि भूमिकांची उजळणीही करायला हवी. दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात नुकत्याच झालेल्या अत्यंत निंदनीय अशा हिंसाचारानंतर शिवसेनेने घेतलेली भूमिका देशातील सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांनाही मागे टाकणारी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तरुणाईला आश्वस्त करताना सांगितले की, राज्यात असा प्रकार घडणार नाही.
आपल्याकडील तरुणांनी स्वतःला असुरक्षित वाटून घेण्याची गरज नाही. त्यातूनही कुणी अशा प्रकारचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम गंभीर असतील. त्याचबरोबर या गुंडगिरीची तुलना त्यांनी 26/11 च्या हल्ल्याशी करतानाच बुरख्याआड दडून आलेल्या गुंडांचा बुरखा फाडला गेला पाहिजे आणि त्यामागील चेहरे जगासमोर आले पाहिजेत, अशी मागणीवजा अपेक्षाही व्यक्त केली. उद्धव यांचे सुपुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी अशा हल्ल्यांमुळे देशाची प्रतिमा जगात खराब होत आहे. त्यामुळे या घटनेचा निर्धारित कालमर्यादेत तपास होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे; अन्यथा परदेशी विद्यार्थी आपल्याकडे शिक्षणासाठी येणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली.
आजवर सांप्रदायिक किंवा धार्मिक राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षापेक्षाही अधिक आक्रमक मानल्या जाणाऱ्या शिवसेनेने स्वतःला या नव्या अवतारात कशा प्रकारे घट्ट बसवून घेतले आहे याचे उदाहरण म्हणून याकडे पाहावे लागेल. तथापि, हा भूमिकाबदल कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्यामुळे तात्पुरता आणि राजकीय सोयीसाठीचा आहे की शिवसेना खरोखरीच बदलते आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेने कात टाकल्याप्रमाणे जुन्या काही विचारांना तिलांजली देत नवे रुपडे धारण करण्यामागची कारणे शोधताना राजकीय परिस्थितीबरोबरच शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाचाही विचार करावा लागेल. हे नवे नेतृत्व म्हणजे आदित्य ठाकरे. तेच या बदलांचे केंद्रस्थान आहेत. मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून येत थेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन आदित्य ठाकरे थेट सरकारमध्ये दाखल झाले.
वास्तविक, उद्धव आणि आदित्य यांनी सक्रिय राजकारणात सत्तापदांवर विराजमान होणे हाही शिवसेनेचा बदलता चेहराच आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच याची कल्पनाही केलेली नव्हती. किंबहुना, त्यांच्या धोरणातही ते बसणारे नव्हते. अन्यथा, 1999 मध्ये राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आली तेव्हा बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री बनू शकले असते. पण त्याऐवजी त्यांनी मनोहर जोशींना आणि नारायण राणेंसारख्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवले. आता मात्र उद्धव आणि आदित्य पिता-पुत्र असे दोघेही सत्तापदावर आहेत. गेल्या काही वर्षांमधील शिवसेनेच्या राजकारणावर नजर टाकल्यास सेनेने आपली प्रतिमा बदलत नेल्याचे स्पष्ट दिसून येते.
साधारणतः गेल्या 6-8 वर्षांमध्ये शिवसेना सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरत आहे आणि त्यावरून आवाज उठवत आहे. तसेच कामगारांच्या प्रश्नांबाबतही शिवसेना आक्रमक होताना दिसून आली आहे. इतकेच नव्हे तर व्हॅलेंटाईन डेला दरवर्षी लक्ष्य करणारी सेना अलीकडील काळात याबाबत तटस्थ भूमिका घेताना दिसून येते. विधानसभा निवडणुकांनंतर तर मुख्यमंत्रिपदाच्या हट्टाखातर सेनेने भारतीय जनता पक्षाशी 36 वर्षांपासून असणारी युतीही तोडून टाकली. 1971 मध्ये शिवसेनेने निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला; पण त्यामध्ये यश आले नाही. यानंतर 1975 मध्ये इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीचे बाळासाहेबांनी समर्थन केले होते. आणीबाणीनंतर झालेल्या 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेनेने कॉंग्रेसचा प्रचार केला होता. इतकेच नव्हे तर 1979 मध्ये शिवसेनेने मुस्लीम लीगसोबत हातमिळवणी केली होती.
1980 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरली नव्हती; पण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्याशी असणाऱ्या मैत्रीखातर बाळासाहेब ठाकरेंनी कॉंग्रेसचा प्रचार केला होता. 1984 मध्ये शरद पवारांनी जेव्हा कॉंग्रेसविरोधी महागठबंधन बनवले होते तेव्हा अनेक छोट्या पक्षांना सोबत घेतले होते. त्यामध्ये भाजपाचाही समावेश होता. मात्र, शिवसेना त्यामध्ये नव्हती. 1984 च्या निवडणुकांमध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी समझोता करून शिवसेनेने मनोहर जोशींसह आपले अन्य उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते.
भाजपा आणि शिवसेनेमध्ये औपचारिकदृष्ट्या युती झाली 1989 मध्ये प्रमोद महाजनांच्या प्रयत्नांमुळे. युती झाली असली तरी बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिली आणि भाजपला कायमच दुय्यम स्थान दिले गेले. शिवसेनेशी काही बोलणी करायची असतील किंवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची असेल तर भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते स्वतःहून मातोश्रीवर बाळासाहेबांच्या दरबारात यायचे. बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत हा सिलसिला सुरू राहिला. मात्र प्रदीर्घ काळ विरोधी बाकावर बसल्यानंतर भाजपा संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहू लागला. शिवसेना स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात मराठी भाषिकांच्या हक्कांसंदर्भात बोलत असे. तसेच कधी गुजरातींचा, तर कधी दक्षिण भारतीयांचा, तर कधी उत्तर भारतीयांचा विरोध करत असे.
हिंदुत्वाशी शिवसेनेची राजकीयदृष्ट्या नाळ भाजपाशी झालेल्या युतीनंतर जोडली गेली. तरीही यूपीएच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना शिवसेनेने उघडपणाने पाठिंबा दर्शवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या दोन्ही पक्षांच्या परस्परसंबंधांमधील अंतर वाढण्यास सुरुवात झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये नरेंद्र मोदींचा उदय झाल्यानंतर शिवसेना भाजपापेक्षा पिछाडीवर गेली. 2014 च्या विधानसभा निवडणुकांनतर शिवसेना आणि भाजपाने सरकार बनवले खरे; पण सेनेने सत्तेत राहूनही वेगळी वाट निवडली.
2014 ते 2019 पर्यंत भाजपाचा छोटा भाऊ किंवा ज्यूनिअर पार्टनर राहून सातत्याने सरकारचा विरोध करत राहायचे ही शिवसेनेची भूमिका दिसून आली. 2016 उजाडेपर्यंत शिवसेनेला हे कळून चुकले की हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या दोन्ही मुद्द्यांबाबत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष खूप पुढे निघून गेला आहे. तसेच भाजपाचा जनाधार विस्तारला आहे. तेव्हापासून शिवसेनेने हळूहळू विभक्त व्हायला सुरुवात केली. त्यांच्या अजेंड्यावर प्रामुख्याने शेतकऱ्यांचा समावेश झाला. बाळासाहेबांची तिसरी पिढी म्हणजे आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणाने झळकू लागले, तेव्हापासून शिवसेनेच्या अजेंड्यामध्ये हळूहळू बदल होत गेला.