– रामचंद्र सोनवणे
राजगुरुनगर – गट व गणाच्या प्रारूप आराखड्यानंतर अस्तित्वात आलेल्या खेड तालुक्यातील सातकरस्थळ-वाडा जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे मातब्बर उमेदवार असून, जोर शिवसेनेचा आणि अडचणही शिवसेनेचीच अशी अवस्था आहे. वर्चस्व टिकणार की उमेदवारी निश्चित होताना नाराजी होऊन त्याचा फायदा राष्ट्रवादी, भाजपच्या संभाव्य उमेदवारांना होणार? यावर या गटात चर्चेला उधाण आले आहे.
पूर्वीच्या वाडा-कडूस आणि सांडभोरवाडी-काळूस गटाचा अर्धा भाग मिळून नव्याने सातकरस्थळ-वाडा जिल्हा परिषद गट तयार झाला आहे. या दोन्ही गटांत शिवसेनेचे सदस्य आहेत. सांडभोरवाडी-काळूसमधून बाबाजी काळे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तर वाडा-कडूसमधून तनुजा घनवट कार्यरत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही उमेदवार तुल्यबळ ठरणार आहेत. गेल्या पाच वर्षात दोघांनीही आपापल्या मतदारसंघ तसेच इतरत्र विकास कामे केलेली आहेत. जनसंपर्क दांडगा आहे.
शिवाय पक्षीय कार्यकर्ते, नेते यांच्याशी सुद्धा सख्य जोपासलेले आहे. या सदस्यांची स्वत:ची गावे आता नवीन सातकरस्थळ-वाडा गटात समाविष्ट झाली आहेत. याखेरीज सेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर देखील इच्छुक झाले आहेत. गटाची लोकसंख्या 38 हजार 634 आहे. आरक्षण जाहीर झाल्यावर उमेदवारी कोणाला द्यायची हा पक्षपातळीवर विचार होणार आहे. सर्वसाधारण किंवा सर्वसाधारण महिला आरक्षण आल्यावर बाबाजी काळे आणि तनुजा घनवट स्वत: किंवा परिवारातील सदस्यांच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जातील.
पक्षाचे पदाधिकारी संजय घनवट, काळेची वाडीच्या सरपंच वैशाली काळे, विद्यमान पंचायत समिती सदस्या सुनीता सांडभोर यांचा त्यात समावेश होऊ शकतो. एकालाच उमेदवारी मिळणार असल्याने दुसऱ्याची नाराजी समोर येणार आहे. या नाराजीचा लाभ अर्थातच विरोधी उमेदवारांना होण्याची शक्यता आहे.
एकाला शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यावर सोयीचे आरक्षण असलेल्या लगतच्या गटात दुसऱ्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तसा शिरोली-कडूस हा गट सुद्धा दोघांनाही अनुकूल असल्याचे सेनेकडून मानले जाते. येथे सोयीचे आरक्षण आल्यास वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून तडजोड होऊ शकेल. ऐन निवडणुकीत पक्षबदल होऊ शकतो. तूर्त संभाव्य उमेदवार व समर्थक विविध कार्यक्रमातून जनतेसमोर येत आहेत.
या गटातून विधानसभेचा विरोधी उमेदवार ठरू शकतो?
खेड-आळंदी मधून गेल्या विधानसभा निवडणुकीत अतुल देशमुख भाजपकडून उमेदवार होते. अर्धी-अधिक मतमोजणी होईपर्यंत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. बाबाजी काळे व संजय घनवट यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला आत्ताच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी प्राप्त झाल्यास ते शिवसेनेकडून विधानसभेचे दावेदार ठरू शकतात. अनिल राक्षे यांच्याकडूनही राष्ट्रवादीत दावा केला जाऊ शकतो.
राष्ट्रवादी, भाजपचाही दांडगा जनसंपर्क
शिवसेनेशिवाय राष्ट्रवादी, भाजपच्या संभाव्य उमेदवारांनी देखील मतदार संघात जनसंपर्क वाढवला आहे. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे, विद्यमान उपाध्यक्ष अरुण थिगळे तसेच माजी सदस्य अनिल (बाबा) राक्षे, डॉ. रोहिणी राक्षे, पंचायत समिती सदस्या सुनीता सांडभोर हे राष्ट्रवादीकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे.
उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीतही रस्सीखेच आहे. तर भाजपा कडून नायफड-वाशेरे गटाचे सध्याचे सदस्य अतुल देशमुख हे किंवा त्यांचा कट्टर समर्थक कडवे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत. गणातील उमेदवार तगडे असावेत यासाठी सर्वच नेते, कार्यकर्ते मतदार संघात चाचपणी करीत आहेत.
धनाची सर्वाधिक उधळण होणार
आगामी निवडणुकीत तन-मन आणि खऱ्या अर्थाने धनाची उधळण येथेच सर्वाधिक होण्याची शक्यता या गटात आहे. तालुक्यातील प्रतिष्ठा, वर्चस्व आणि भविष्यातील निवडणुका यासाठी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व भाजपाकडून अतुल देशमुख यांच्या डावपेचाकडे मतदारांचे लक्ष लागून राहील. प्रत्यक्ष आरक्षणा नंतर सातकरस्थळ-वाडा गटाला निवडणुकीत महत्व येणार आहे.