अनिल राठोड यांच्या प्रचारातील सहभागाबाबत अद्याप निर्णय नाही
नगर – केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक शहराला व जिल्ह्याला भरीव निधी दिला आहे. नगर शहरालाही तो दिला.मात्र येथील त्यावेळचे महानगरपालिकेचे सत्ताधारी अर्थात शिवसेना कमी पडली. शहराच्या उड्डाणपुलाच्या कामात तर शिवसेनेने अडथळे आणत मला वारंवार त्रास दिला असा आरोप भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठाड यांचे नाव न घेता केला. राठोड यांच्या प्रचारात सहभागी होण्याबाबत कोणतीही निर्णय न घेता येत्या तीन-चार दिवसात माझी भूमिका जाहीर करेल,असे गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केली.
केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या विकास योजनांबाबत माहिती देण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राज्यात ठिकठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी गांधी यांनी योजनांची माहिती दिली.गेल्या काही दिवसांपासून गांधी व राठोड यांच्यातून विस्तवही जात नाही. राठोड हे सेनेचे उमेदवार असतील तर भाजप वेगळा करेल असा इशारा राठोड यांना दिला होता.
तर मागील आठवड्यात राठोड यांनी आले तर त्यांच्यासोबत अन्यथा त्यांच्याविना अशी भूमिका जाहीर केली होती.मात्र सेनेच्या उमेदवारीची माळ राठोड यांच्या गळ्यातच पडल्याने बाकी भाजपातील सर्व गट त्यांच्या निवडणुकीत सक्रीय झालेले असताना गांधी यांनी मात्र अलिप्तपणाची भूमिका घेतली आहे.गाधी एकीकडे राज्यात व जिल्ह्यात बाकी ठिकाणी भाजप-सेनेच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आव्हान करत असताना शहरात मात्र सेनेच्या उमेदवारालास साथ देण्याचे अजूनतरी त्यांच्या डोक्यात दिसत नाही.
पत्रकांनी यावर वारंवार विचारले असता त्यांनी यावर काही बोलण्यास नकार देताना लवकरच भूमिका घेणार असल्याचे सांगत याविषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र,पत्रकारांनी केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना शहरात जनहिताचे मोठे प्रकल्प का आले नाहीत असे वारंवार विचारले असता मनपातील सत्ताधाऱ्यांनी अर्थात शिवसेनेने या कामात श्रेयासाठी अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत या कामात मला त्यांनी प्रचंड त्रास दिला असे गांधी राठोड यांचे नाव न घेता म्हणाले.बाह्यवळण रस्त्याच्या प्रक्रिया पूर्ण होत आल्या असून हा महत्वाचा विषय लवकरच मार्गी लागेल,असे गांधी म्हणाले.