नेवासा – भाजपा-शिवसेनेची युती झाल्यास शेतकरी प्रतिनिधी म्हणून नेवासा विधानसभेची जागा शिवसेनाच लढवणार असल्याचे संकेत तालुकाप्रमुख शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी दिले आहे.
मुंबई येथे झालेल्या शिवसेना पक्षाच्या मुलाखती प्रसंगी देसाई यांनी हे संकेत दिले. यावेळी आमदार नीलम गोऱ्हे, उपनेते अरविंद नेरकर आदींच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. तालुक्यातून इच्छुक असलेले तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के यांच्या मुलाखतीवेळी अनेक विषयांवर चर्चा करत निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले.
मागील पाच वर्षे भाजपच्या आमदारांनी शिवसेनेला दिलेली वागणूक, तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तालुक्यात किती संधी दिली, ही देखील चिंतनाची गरज आहे. तसेच तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राची परिस्थिती जाणून घेत नवीन प्रकल्पासाठी पक्षाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले. राज्यात शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत असून, अनेक मतदारसंघात शिवसेना शेतकरी प्रतिनिधींना संधी देणार आहे. शिवसेनेने आतापर्यंत सर्वसामान्यांना उमेदवारी देऊन न्याय दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार निवडणुकीत उतरवण्याचे संकेत दिले आहेत.