थेऊर – महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरूवारी (दि.28) सायंकाळी 6.40 वाजता शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जिल्ह्यातून किमान 50 ते 60 हजार शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघतील. याबाबतचे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून शिवसैनिकांनी गुरूवारी (दि.28) सकाळी 11 वाजता एक्सप्रेस वे टोलनाक्यावर एकत्रित यावे, असे आवाहन शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे.
ज्येष्ठ नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असून यावेळी माजी आमदार सुरेश गोरे आणि शरद सोनवणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी सोबत असणार आहेत. याबाबत जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख कटके यांनी सांगितले की, राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे.
राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पत्र दिल्याने गुरूवारी (दि.28) शिवतीर्थावर 6:40 वाजता उद्धव ठाकरे शपथ घेत आहेत. या सोहळ्याचे महत्त्व सांगताना कटके म्हणाले की, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजपर्यंतचा राजकीय प्रवास सोपा राहिलेला नाही. 1985 मध्ये शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर ताबा मिळवला. या निवडणुकीपासून उद्धव यांनी शिवसेनेच्या निवडणूक कॅम्पेनिंगमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली.
परंतु, ते भविष्यात राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय होतील, असे कोणालाही वाटत नव्हते. परंतु, दि. 17 नोव्हेंबर 2012 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे एकटे पडले, त्यांना राजकीय संघर्ष करावा लागला. त्यातही ते एकदा तरी शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसवेन, असे बाळासाहेबांना दिलेले वचन विसरले नाहीत.
उद्धव ठाकरे यांचा शांत आणि संयमी स्वभाव त्यांच्या कामी आला. त्याच गुणांनी त्यांना या सर्व आघाड्यांच्या संघर्षातून तारून नेले. राज्यात मोदी, शहा, फडणवीस यांचा झंझावात सुरू असताना आणि यातून वेळावेळी पक्षाची गळचेपी होत असताना ते पाय रोवून उभे राहिले. निवडणूक न लढविण्याची परंपरा मोडीत काढीत त्यांनी आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघातून निवडून आणले. तसेच, महाराष्ट्राच्या जनतेनंही शिवसेनेला साथ दिल्याने 63 जागांवर सेनेला यश मिळाले. त्यानंतरही भाजपने सत्तास्थापनेवेळी शिवसेनेला पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
या राजकीय लढाईत ठाकरे यांनी आपला वजीर म्हणून खासदार संजय राऊत यांच्या हाती सुत्रे सोपवित सत्ता सोपानाचा रथ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेकडे ओढून आणला. हे शिवसेनेसाठी मोठे यश मानले जात असल्याने तसेच उद्धव ठाकरे गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन पूर्ण करीत आहेत. याच कारणातून शिवतिर्थावर होणारा उद्याचा शपथविधी सोहळा शिवसेनेच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा ठरणारा आहे. याचे साक्षिदार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जात असल्याचे जिल्हा प्रमुख कटके यांनी सांगितले.
शिवसैनिकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा होणारा शपथविधी ऐतिहासीक असाच असणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात हा एक सुवर्णक्षण असल्याने या सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहात आहोत. मराष्ट्राच्या इतिहासातही या सोळ्याला मोठे महत्त्व असणार आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार, शिवसेना उपनेतेमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर वीस वर्षानंतर पुन्हा एक शिवसैनिक बसत आहे. तमाम शिवसैनिकांच्या दृष्टीनं ही मोठी आनंदाची बाब आहे. त्यातही उद्धवजी मुख्यमंत्री होत असल्याने हा सोहळा शिवैनिकांसह थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी नातं सांगणारा आहे. – ज्ञानेश्वर कटके, जिल्हा प्रमुख, शिवसेना