मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्तारात 36 नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये. अन्यथा मातोश्रीवर कॅमेरे लागतील, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
खातेवाटपामध्ये सध्या शिवसेनेकडे असलेले राज्याचे गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला देण्याची चर्चा आहे. महाविकासआघाडीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत 28 नोव्हेंबरला 6 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येकी 2 मंत्र्यांचा समावेश होता. त्या पक्षांमधील सत्तावाटपाच्या सुत्रानुसार सर्वांधिक 16 मंत्रिपदे शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे समजते. तर राष्ट्रवादीला 14 आणि कॉंग्रेसला 12 मंत्रिपदेच मिळणार असल्याची माहिती आहे.