मुंबई : शरद पावर यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करून शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फिरवल्यानंतर शिवसेनेने आपले 55 आमदार नवी मुंबईतील हॉटेल ललितमध्ये हलवले. तर कॉंग्रेसने आपल्या आमदारांना भोपाळला नेले आहे.
शिवसेनेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आमदारांचे मोबाईल काढून घेण्यात आले असून एका कक्षात दोन आमदारांच्या रहिवासाची सोय केली आहे. त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तेथे भेट देत शिवसेनेच्या आमदारांना आश्वस्त केले. आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत. या शपथविधी विरोधात न्यायलयीनम लढा उभारू. आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिवसेना त्यांच्या पध्दतीने उत्तर देईल, आगीशी खेळायचा प्रयत्न भाजपाने करू नये, असे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी कॉंग्रेसने त्यांचे आमदार भोपाळला हलवले आहेत. त्यांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय महानाट्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी नेण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापुर्वी या आमदारांना राजस्थानातील जयपूरची सहल घडवून आणली होती. भाजपाचा विधानसभेत बहुमतचाचणी वेळी पराभव करण्यासाठी आमदारांना एकत्र ठेवणे आवश्यक आहे, असे पक्षातील सुत्रांनी सांगितले.