मुंबई : शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल मोठी घोषणा केली. संभाजी ब्रिगेडशी युतीची घोषणा केली आहे. भाजप नेते निलेश राणेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केल्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू”, असे म्हणत उद्धव ठाकरेनी या युतीचं स्वागत केलं होतं. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान, निलेश राणेंनी उद्धव ठाकरे सैराट मित्रमंडळाशी देखील आता युती करतील, असा टोला लगावला आहे. निलेश राणेंनी यासंदर्भात एक ट्वीट करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य के आहे. “उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आङे की ते सैराट मित्र मंडळाशीही युती करतील”, असे या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्र मंडळ सोबत सुद्धा युती करतील.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 26, 2022
या अगोदर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात बोलताना टीका केली आहे. “संभाजी ब्रिगेडने २०१९ मध्ये ४० जागांवर निवडणूक लढवली. त्यांना ०.०६ टक्के मतं मिळाली. उद्धव ठाकरेंना इतकी कमी मतं मिळवणाऱ्या पार्टनरसोबत युती करावी लागतेय. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. त्यांच्यासोबतचे मित्र त्यांना सोडून पळून जातील. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काही होणार नाही. ते महाराष्ट्राला आव आणून सांगत आहेत. पण हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत वाईट आहे”, असे बावनकुळे म्हणाले होते.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर पुढील निवडणुका देखील आम्ही सोबत लढवू शकतो, असे सूतोवाच उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले. त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडसोबतची त्यांची युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित केला जात आहे.