मुंबई – शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वोच्च न्यायालयात दोन सुनावणीनंतर देखील बंडखोरांवर कोणताही निर्णय झालेला नाही. अशात न्यायालयाने ८ ऑगस्टची तारीख पुढील सुनावणीसाठी निश्चित केली आहे. अद्याप राज्यात नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती बिघडली होती. यानंतर आता “मुख्यमंत्री शिंदेही आजारी पडल्याचे वृत्त अलीबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक आहे” असं म्हणत शिवसेनेने शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या धनुष्य बाणावर सध्या कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. त्यातूनही अनेकांना नवे आजार जडू शकतात. एक गोष्ट मान्य केली पाहिजे, शिवसेनेची बाजू सत्याची आहे व ५६ वर्षांच्या आयुष्यात शिवसेनेने विश्वासघाताचे असे हलाहल अनेकदा पचवले आहे. त्यामुळे घाव घालणाऱ्यांच्याच तलवारी तुटल्या, असे इतिहास सांगतो अशा शब्दात शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनामधून शिंदे गटाला खडे बोल सुनावले आहेत.
काय म्हणटलंय नेमकं सामनात
सामनाच्या अग्रलेखात शिंदे गटाचा उल्लेख अलीबाबा आणि चाळीस चोर असा करण्यात आला आहे. एकत्र शिंदे यांना दिल्लीची हवा मानवात नाही किंवा महाराष्ट्राची हवा पुन्हा बिघडली असल्याने शिंदे यांना गुदमरल्यासारखे झाले असावे. लग्न झाल्यावर पाळणा हलला नाही की लोक संशयाने पाहतात आणि दाम्पत्यास अनेक सॅले देतात,शिंदे यांच्या बाबत तेच सुरु आहे. मुख्यमंत्री पदाची वरमाला बळेबळ गळ्यात घालून घेतली. पण मंत्रिमंडळ जन्माला येत नाही त्यामुळे शिंदे फडणवीसांच्या मधुचंद्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्टातील सत्तासंघर्षच फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडले की आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला,पण लग्नच करायचं विसरलो अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे अशा शब्दात सामनातून शिंदे गटावर खरमरीत टीका करण्यात आली आहे.