मुंबई – सन 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात एनडीए सत्तेवर आली तर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे नरेंद्र मोदींनी त्याच वेळी स्पष्ट केले होते, असा जो दावा गृहमंत्री अमित शहा यांनी कालच्या पुण्याच्या सभेत केला आहे, तो दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सपशेल फेटाळून लावला आहे.
आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही भाजपला सोडले नाही तर सन 2014 साली भाजपनेच सत्तेतील जादा वाटा मिळावा म्हणून आम्हाला दूर केले होते असे ते म्हणाले. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे असा आरोप अमित शहा यांनी केला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.
शिवसेनेने भाजपचा विश्वासघात करून केवळ मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसशी हातमिळवणी केली असा आरोप अमित शहांनी केला होता. त्याचा समाचार घेताना राऊत यांनी म्हटले आहे की, त्यांचे हे वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नाही. आमच्याविषयी भलतेच दावे करून ते देशाची दिशाभुल करीत आहेत. पण लोक त्यांच्या कोणत्याही दाव्यावर विश्वास ठेवणार नाहीत.शिवसेना कदापिही हिंदुत्व सोडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.