मुंबई – शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे.
या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, शिंदे गटाकडे दोन तृतियांश संख्याबळ आहे. तसेच 50 आमदार आणि 12 खासदारही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दिल्लीत गेले होते. त्यावेळी ते निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यांनी ही भेट घेतली नाही. परंतु शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना म्हणून मान्यता मिळवण्यासंदर्भात आणि निवडणूक चिन्हाबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, बुधवारी शिंदे गटाने थेट निवडणूक आयोगाकडे पत्र देऊन शिवसेनेवर दावा केला आहे.
…म्हणून टाळली संजय राउत यांनी ईडीची चौकशी
दरम्यान, आमदारांसह खासदारांनीही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. 19 खासदारांपैकी 12 खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
परंतु, कोणीही दावा केला गेल्यास आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती यापूर्वीच शिवसेनेने निवडणूक आयोगाला केली आहे. यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “हा मविआ सरकारच्या…”