मुंबई – राज्यातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन नावे जाहीर करण्यात आली आहेत. या निवडणूकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
मुंबई, ठाणे, रायगड या मतदार संघातील शिवसेनेच्या आमदारांच्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या करण्यात आल्या असल्याचे समजते. त्यामुळे उद्या, मंगळवारी उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे.
शिवसेनेकडून दोन उमेदवार म्हणजेच, उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली आहे. अद्याप राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस याच्याकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही. भाजपमध्ये मात्र विधान परिषदेसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी महाविकास आघाडी 6 उमेदवार देणार, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. तर दुसरीकडे 4 जागा भाजप आमदारांच्या संख्याबळावर जिंकेल, असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सहा आणि भाजप आणि चार उमेदवार उभे केले तर नऊ जागांसाठी दहा उमेदवार असतील. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचे अवघड आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणे आवश्यक आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विधान परिषदेच्या या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली होती.