मुंबई – नाशिक येथे सुरु असलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली आहे. या प्रकारानंतर शाईफेक हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याप्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. साहित्य संमेलनात अशाप्रकारचे कृत्य करणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, “या सर्व घटनेचा मी निषेध करतो. गिरीश कुबेर जेष्ठ पत्रकार, वर्तमानपत्राचे ते संपादक आहेत. त्यांनी काही लिखान केले असेल किंवा करत आहेत, त्याबाबत मतभेद असू शकतात. गेल्या काही काळात हा वाद झाला होता. तो मी वाचलाय. मुळात त्यांनी काय लिहिले आहे? हे किती लोकांनी वाचले आहे? न वाचता त्यांच्यावर मराठी साहित्य संमेलन सुरु असताना शाईफेक करणे चुकीचे आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशाप्रकारचे कृत्य करणे हे कुणालाही मान्य होणार नाही. त्यांनी पुस्तकात जे काही लिहिले आहे त्याबाबत लोकांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यासंदर्भात कायदेशीर कारवाई होईल. पण साहित्य संमेलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सर्वात मोठे व्यासपीठ असते. तिकडे येऊन तुम्ही शाईफेक करत आहात, त्यांना धक्काबुक्की करत आहात. सावरकर, कुसमाग्रज यांच्या भूमित असे करुन तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला डागाळले आहे”, असे संजय राऊत म्हणाले. तसेच ज्यांना कुबेर यांचे लिखान पसंत नाही, त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा करावी, पुरावे द्यावे. पण अशाप्रकारे शाईफेक करणे चुकीचे आहे, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले आहे.
काय आहे वाद?
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’या पुस्तकावरून वाद सुरू होता. या पुस्तकातील मजकूराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गिरीश कुबेर यांच्या सदर पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती.