धुळे – चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी वाढदिवस साजरा करावा. घरी गोडधोड खावं. कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत, विशेष लहान मुलाप्रमाणे चंद्रकांत पाटलांकडे पाहावे. चंद्रकांत पाटील अत्यंत गोड माणूस आहेत. ते अत्यंत निरागस आणि निष्कपट आहेत. लहान मुलं कसं बडबड करतं तसा आनंद घ्यायचा असतो, असा शब्दात फिरकी घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
चंद्रकांत पाटील यांच्या “आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही’ या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, शिवसेना काय आहे, कोण वाघ आहे हे देशाने पाहिले आहे. या वाघांची जातकुळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून कळते. या वाघाने तुम्हा सगळ्यांना खेळवले आणि लोळवले सुद्धा आहे, असे राऊत म्हणाले.
तसेच हे सरकार 5 वर्षे टिकेल. लोकसभा, विधानसभा देखील लढवू. प्रत्येकाला वाटते की आपला मुख्यमंत्री व्हावा तो प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. नाना पटोलेंना वाटते की त्यांचा मुख्यमंत्री व्हावा त्यात गैर नाही, असेही राऊत म्हणाले.
मोदींमुळेच भाजपला यश
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे आणि भाजपचे मोठे नेते आहेत, असा माझा विश्वास आहे. गेल्या सात वर्षात भाजपला मिळालेले यश केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. ते ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाला वाटतं की त्यांचा चेहरा प्रत्येक निवडणुकीला वापरला पाहिजे. प्रत्येक निवडणूक पंतप्रधानांच्या नावावर जिंकावी. अटलबिहारी वाजपेयी यांचाही फोटो सगळीकडे वापरला जायचा, असेही ते म्हणाले. लोकांच्या मनात एखादा नेता असेल तर ते कुणालाही पुसता येत नाही, असेही ते म्हणाले.