यवतमाळ: शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या आहेत. या प्रकरणी गवळींनी कोतोही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे. गवळी यांच्या संस्थांवर छापे पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. यानंतर आज मुंबई येथील ईडीचे अधिकारी रिसोड तालुक्यात धडकले.
काहीजण देगाव येथील बालाजी पार्टिकलला पोहोचले. काही अधिकारी रिसोड शहरातील दि रिसोड अर्बन कॉ. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड येथे दाखल झाले आहेत. त्यांनी शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.