उस्मानाबाद – अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांच्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान चोरी झाल्याची घटना घडली आहे.
अज्ञात चोरट्याने शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोनसाखळी पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली असून पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.
शरद पवार हे 18 आणि 19 हे दोन दिवस दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी तुळजापूर येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा आणि भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत, असं शरद पवार म्हणाले.
तसेच येत्या 10 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्राला मदत करण्याची मागणी करणार असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता संकटाचा धीराने सामना करावा, असेही शरद पवार म्हणाले.