मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणात काहीच नव्हते, असे फडणवीस यांनी म्हंटले. या वक्तव्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. ‘मिरच्या झोंबल्या, ठसका लागला, बांबू लागला म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना? नाही तर एवढी मोठी पत्रकार परिषद कशाला घेतली असती? स्वत:चा आणि इतरांचा वेळ का घेतला? याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण सुपरहिट, दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत झाले आहे. त्यामुळे आपण सर्व अस्वस्थ आहात, असा चिमटा राऊत यांनी काढला.
शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर का केले नाही? या फडणवीसांच्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, आपणही पाच वर्ष मुख्यमंत्री होता. त्यावेळी औरंगजेबाला कवटाळून बसला होता का? हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री होता ना? एखाद्या शहराचं नाव बदलायचं असेल तर केंद्राची परवानगी लागते. गेल्या काही वर्षापासून सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत आहे. केंद्राने का परवानगी दिली नाही हे विचारावे लागेल. तुम्हीही पाच वर्ष मुख्यमंत्री होता, औरंगाबादचे नामांतर करावे असे तुम्हाला का वाटले नाही. योगींनी प्रयागराज करून घेतले तसंच फडणवीसांनी औरंगाबादचे संभाजी नगर का केले नाही? हा सुद्धा प्रश्न आहे. बाळासाहेबांनी जेव्हा संभाजी नगर म्हणायला सुरुवात केली तेव्हाच आमच्यासाठी औरंगाबादचं संभाजी नगर झालं आहे, असंही ते म्हणाले.