कर्नाटक पोलिसांबाबत संताप; पाकिस्तानी देशात येऊ शकतात तर पाकिस्तानी का नाही?
बेळगाव : पाकिस्तानी, बांगलादेशी आणि रोहिंग्या या देशात येऊ शकतात, तर महाराष्ट्रातील कोणी बेळगावात का जाऊ शकत नाही, असा सवाल शिवसेना नेते आनि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केला. दरम्यान, बेळगाव विमानतळावर संजय राऊत यांचे आगमन झाले. मात्र त्यांना पोलिस अज्ञातस्थळी घेऊन गेल्याने खळबळ उडाली आहे.
त्यापुर्वी राऊत यांनी कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली. पाकिस्तानी, रोहींग्या आणि बांगला देशी देशात येऊ शकतात आणि महाराष्ट्रातील कोणी कर्नाटकात जाऊ शकत नसेल तर ते चुकीचे आहे. सीमावाद आहे पण अशी बंधने एकमेकांवर लादणे चुकीचे आहे, असे राऊत पत्रकारांना म्हणाले.
राज्यसभेचे सदस्य असणाऱ्या राऊत यांना बेळगाव जिल्ह्यात येण्यास बंदी घातल्याची सुचना त्यांना दिल्यानंतर राऊत म्हणाले, हे चुकीचे आहे, आपण सर्व भारतीय आहोत. निर्बंध लादले असले तरी मी तेथे जाणार. लोकांना भेटणार आणि कार्यक्रमात सहभागी होणार, असे राऊत यांनी ठामपणे सांगितले.
कर्नाटकात मराठी भाषकांवर हल्ला होत आहेत. गेल्या काही काळात मराठी माणसे आणि मराठी भाषा यांच्यावर कर्नाटक सरकारकडून सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. मराठी साहित्यिकांच्या बैठकीवरही निर्बंध घालण्यात आले, असे ते म्हणाले.