नवी दिल्ली – राज्यातील सत्तास्थापनेवरून भाजप-शिवसेनेचा वाद विकोपाला गेला असून एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपवर विखारी टीका करण्यात आली. या टीकेला भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही सामना वाचत नाही. जे त्यात लिहितात तेच वाचतात, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.
जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी म्हंटले कि, शिवसेनेचे नेते गजनी बनले आहेत. दोन दिवसांपूर्वी वेगळे आणि आज वेगळे बोलत आहेत. तसेच आम्ही महाराष्ट्राला चांगले सरकार देण्याचे वचन दिले होते. शिवसेनेने जनतेचा विश्वासघात केला आहे. जो पक्ष सत्तेच्या मागे पळत असतो तो कधी ना कधी विखुरताना दिसतो, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण, असा प्रश्न शिवसेनेने भाजपला विचारला होता. पैसा व सत्तेचा माज शिवरायांच्या मातीत चालत नाही याचा अनुभव कालच्या विधानसभा निवडणुकीत आलाच आहे. शिवरायांचा महाराष्ट्र पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना सहजासहजी सोडणार नाही, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीका केली होती.