मुंबई – केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला देशव्यापी पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेनेही या संपाला पाठिंबा दिला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
शेती हा काही शिवसेनेचा विषय नाही. सेनेला तेवढी अक्कलही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विरोध करण्यासाठीच शिवसेनेने या विषयाची काही जाण नसूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवसेना केवळ विरोधाला विरोध करत आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
शिवसेना हा कन्फ्युज पक्ष आहे. अलीकडच्या काळात शिवसेना कुठल्याही एका भूमिकेवर ठाम राहिल्याचे दिसत नाही. ते रोज नवीन खोटं बोलतात. एक दिवस महाराष्ट्राची जनता त्यांची दखल घेणे बंद करेल. त्यामुळे राज्यात लवकरच शिवसेना हा पक्षच अदखलपात्र ठरेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
फक्त पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधातील तीव्रता जास्त आहे. इतर कुठल्याही राज्यांमध्ये तशी परिस्थिती नसल्याचा दावाही निलेश राणे यांनी केला आहे.