मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पाच वर्षांसाठी शिवसेनेकडेच राहील असं स्पष्ट केलं. ते नाशिक येथे बोलत होते. महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्रीपद, स्थानिक निवडणूका तसेच शरद पवार-प्रशांत किशोर भेट या मुद्द्यांवर संजय राऊत यांनी यावेळी भाष्य केले.
राज्याचे मुख्यमंत्रीपद पाच वर्षांसाठी शिवसेनेकडेच
मुख्यामंत्रीपदाबाबत बोलताना राऊत यांनी, “शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही कमिटमेंट आहे. असं मी रोखठोक मध्ये म्हटलेलं आहे. कारण, आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसं इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून झाली आहे आणि मला असं वाटतं की, शरद पवार यांनी देखील परवा जाहीरपणे हेच वक्तव्यं केलंल आहे.” असं स्पष्ट केलं.
काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याच्या पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी आगामी काळात काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवेल असं वक्तव्य केलं होत. याबाबत विचारले असता राऊत यांनी, “या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, काँग्रेसमध्ये एका पेक्षा एक सरस लोकं आहेत. सगळ्याच राजकीय पक्षात असे दावेदार असतात, प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांना वाटतं पंतप्रधान व्हावं. काँग्रेसमध्ये देखील खूप प्रमुख लोकं आहेत की जे पंतप्रधान पदाच्या लायकीचे उमेदवार आहेत, नक्कीच आहेत आणि राजकारणात कोणतीही आकांक्षा आणि स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही.
प्रत्येकाला आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार
“मला वाटत नाही काँग्रेसची काही नाराजी आहे. तुम्ही त्याकडे नाराजी म्हणून का पाहाता? तीन भिन्न विचारांचे पक्ष आहेत, त्यातून एक महाविकासआघाडी निर्माण झालेली आहे. ज्याला आपण किमान समान कार्यक्रम म्हणतो, त्या आधारावर हे सरकार बनलेलं आहे. हे सरकार बनवताना तीन पक्ष एकमेकांमध्ये विलीन झालेले नाहीत. पक्षाचं अस्तित्व स्वतंत्र आहे. प्रत्येकाची विचारधारा स्वतंत्र आहे. सरकार बनवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, प्रत्येकाला आपला पक्ष विस्तारण्याचा वाढवण्याचा आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.”
शरद पवार प्रशांत किशोर भेटीवर प्रतिक्रिया
राऊत यांनी यावेळी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यामध्ये झालेल्या भेटीबाबत वक्तव्य केलं. ते म्हणाले, “प्रशांत किशोर व उद्धव ठाकरे यांच्या देखील अनेकदा भेटी झालेल्या आहेत. प्रशांत किशोर व राहुल गांधी यांच्या देखील भेटी झालेल्या आहेत. प्रशांत किशोर यांना मी देखील अनेकदा भेटलेलो आहे. मला प्रशांत किशोर हे या संपूर्ण राजकीय व्यवस्थेमधील एक राजकीय रणनीतीकार आहेत, त्यांची एक यंत्रण आहे व त्या राजकीय यंत्रणेचा वापर देशातील सर्वच राजकीय पक्ष घेत असतात.”
“कधी काळी हेच प्रशांत किशोर भाजपासाठी काम करत होते. नितीश कुमारांसाठी काम करत होते. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी काम करत होते. उत्तर प्रदेशात राहुल गांधींसाठी काम करत होते. मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेसाठी काम केलेलं आहे. अशा भेटीतून तुम्ही राजकाय अर्थ काढण्यापेक्षा प्रत्येक राजकीय पक्षाला अशाप्रकारच्या राजकीय यंत्रणेची गरज असते आणि शरद पवार हे सातत्याने अशाप्रकारच्या व्यक्तींना भेटून देशाच्या आणि राज्याच्या संदर्भातील काही नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करत असताता हा माझा अनुभव आहे.” असं राऊत म्हणाले.