भाळवणी – महाराष्ट्र ही देशाची, तर शिवसेना ही महाराष्ट्राची गरज असून, राज्याची अस्मिता स्वाभिमानी शिवसेनेमुळे जीवंत असल्याचे मत शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे यांनी व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री औटी, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले, रामदास भोसले, अनिकेत औटी, गणेश शेळके, सरपंच लीलाबाई रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे, ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे, बाबासाहेब तांबे, गंगाधर रोहोकले आदी यावेळी उपस्थित होते.
बानगुडे म्हणाले, आपण महाराष्ट्राला पुरोगामी राज्य संबोधतो. परंतु काही राजकीय पक्षांकडून आपली राजकीय दुकानदारी चालविण्यासाठी जाती-जातींमधील नाती संपविण्याचे काम केले जात आहे. सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका शिवसेनेने नेहमीच जपली आहे. मात्र सत्ता गेल्यावर राष्ट्रवादीला भगव्याची आठवण झाली आहे, असे सांगत त्यांना आताच शिवसुराज्याची आठवण कशी झाली, असा सवाल उपस्थित केला.
राज्यात 9 हजार अभियांत्रिकी महाविद्यालये असताना 68 टक्के लोकसंख्या अवलंबून असणाऱ्या शेती संदर्भातील कृषी विद्यापीठांची संख्या फक्त 4 आहे. कशाला प्राधान्य द्यावे हेच लक्षात न आल्यामुळे हा विरोधाभास निर्माण झाला आहे असेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरूच राहिल असेही ते म्हणाले. यावेळी महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन जयश्री औटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. निवेदन अभिनेत्री मेघना झुझम यांनी केले.